Sunday, March 31, 2013

मृत्यू...

मृत्यू...
 
किती हि वाटलं तरी ज्याची भेट टाळता येत नाही असा.
'आहे' ला 'होतं' करणारा,वर्तमानाला भूतकाळ बनवणारा.
बोललेलं एखादं वाक्य 'शेवटचं' ठरवणारा.
वाक्यामागे स्वल्पविराम लावावा कि अल्पविराम लावावा                                                                                                             ह्या संभ्रमात असतानाच अचानक येऊन पूर्णविराम लावणारा.

अंत म्हणजे आयुष्य आणि अनंत यांमधली एक सूक्ष्म रेषा.
एका भेटीतच या अंताच्या अलिकडचे पलीकडले होऊन जातात.
हिशोब थांबवणारा, जगणं लांबवणारा...
घराला किती हि मजबूत दारं लावली तरी त्यांना न जुमानणारा.

मृत्यू काहीतरी देऊन जातो कि काही घेऊन जातो?
वर्षानुवर्षे अडगळीत असेच पडून राहिलेल्या खटल्यांचा क्षणात निकाल लावणारा..
मृत्यूला पर्याय नसतात आणि नियम हि नसतात.
क्षणात आयुष्याला परकं करणाऱ्या मृत्यूला कधीच परकं करता येत नाही.
तो आपला आयुष्यभर पाठलाग करतो...अगदी मनापासून...आपल्या सावलीसारखा
मृत्यू अफाट असतो...आभाळाएवढा...
 किरर्र 
(संकलन )

Tuesday, March 26, 2013

मामाचं पत्र हरवलं !

 
 मामाचं पत्र हरवलं  !
पूर्वेकडुन..पश्चिमेकडे....
ज्या वयात शुभम् करोती म्हणायची त्या वयात...जॉनी जॉनी येस पापा म्हटल जातय......
माझ्या मामाच पत्र हरवलं म्हणत,
रिंगण घालुन तालासुरात फेर धरायचो पण आता कम्प्युटर मोबाईल्सच्या गेम्सच्या जमान्यात मामाच पत्र खरच हरवलय....
त्रिकोणी-चौकोनी कुटुम्बात "आजीच्या गोष्टी" हरवल्यात....
सुट्टीमध्ये मामाच गाव नक्की असायच.....पण हल्ली सुट्टीच नाही मिळत...शाळेला मिळाली तरी क्लास्स सुरुच असतात....आणि मिळालीच तरी जवळच्या डेस्टीनेशन वर घालवली जाते.......
फेसबुकवर वॉट्सएप वर रोज 10 जणांना "हाय" "हाउ आर यु" विचारणारे आपण........एकदाच आईला "कशी आहेस...." म्हणुन विचारतो का.....?
फेसबुक...वर तास तास गप्पा मारणारे आपण घरात एकत्र गप्पा मारायला बसतो का..?
7 ते 10 रुपयाच्या सिगरेट ...दिवसाला दहा दहा वेळा ओढताना....वाटत नाही का कुठे तरी चुकतोय आपण....?
हल्ली एन्जॉयमेन्टची डेफीनेशन बदलली आहे......दारु पिणे....नशेत गुंग होणे म्हणजे एन्जॉयमेण्ट....
ओबमा म्हणाले होते अमेरिकेसमोरची सगळ्या मोठी समस्या म्हणजे वाहवत चाललेली तिथली तरुण पीढी........आपणही त्याच मार्गावर आहोत का...?
विवेकानंदांचा तरुण भारत वाहवत चाललाय.....
गरज आहे जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ देणा-या  तुकारामांच्या अभंगाची...
गरज आहे सावरकरांच्या राष्ट्रवादी विचारांची......
गरज आहे छत्रपती शिवाजींना मनात रुजवण्याची.....
गरज आहे
पूर्वेकडुन..पश्चिमेकडे  चाललेला हा प्रवास इथेच थांबवण्याची.....
किर्रर  
(संकलन)

Monday, March 18, 2013

आज एक चिमणी स्वप्नात आली ... !

आज एक चिमणी स्वप्नात आली ... !

चिव चिव चिवचिवली ... अख्खं लहानपण लख्ख जागं करून गेली ... !
मी म्हटलं ... कधीतरी खिडकीत येत जा की गं ... माझ्या मुलाला पहायचंय तुला ... !
 
मी असं म्हणताच खुदकन हसली ... म्हणाली .. सिमेंटच्या जंगलातल्या त्या कॉन्क्रीटच्या माणसांत आता मन रमत नाही माझं .. ! 
इतकं म्हणून पुन्हा चिवचिवली ... दोन पायांत घट्ट धरलेला शेंगदाणा हलकेच माझ्या ओठांत भरवला ... नि ओल्या स्वरात म्हणाली .. हा शेवटचा 'चिऊ' चा घास ! यानंतर मी तुला चिमणरावांच्या गोष्टीत भेटेन नाहीतर मग तुझ्या मुलाच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात .. असं म्हणून भुर्रकन उडाली ... ! 
मी दचकून डोळे उघडले नि समोरची रिकामी खिडकी बघून सुन्न झालो .. खिडकीच्या चौकटीवर जमलेल्या धुळीत चिमणीच्या पायाच्या खुणा उमटल्या होत्या .. त्या पाहिल्या आणि तेव्हा जाणवलं ... येणाऱ्या पिढीनं नेमकं किती आणि काय गमावलंय ते ... !
किर्रर 
(संकलन)

Saturday, March 16, 2013

धीर


पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि,
"विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"
त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलूनकोस,फक्त हसत उभा रहा" पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.
तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,
श्रीमंत भक्त :-
"देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"
(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही,
त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला ....... ...
(पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )
गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच
मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव,माझ्याकडून तुझीभरपूर सेवा करून घे.. .....
देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही,
माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"
( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो..... ...गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )
पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "
(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीटनसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो... .....
(तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )
तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस,मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"
(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचारकरतो कि स्वत: पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" .....त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी व श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)
रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"
गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपेकाम आहे,
पण आज मला कळले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ..... ..
पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.
तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास,तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही. .......
तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" .......
गोकुळ मान खाली घालून उभा राहतो .... ......
पांडुरंग पुढे म्हणतो ....... ..
अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते,
आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती.
त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील
पापाचा साठा कमी होणार होता.त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकचरुपया राहिला होता, तरी देखील
श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मीत्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त
गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.
त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील
वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत
तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.
पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा पांडुरंग झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले .... .
"देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो"
तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्तआपल्या चांगल्यासाठीच करत आहे......
फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.

किर्रर 
(संकलन)

जिवदान


 जिवदान

सायंकाळी  समुद्रकाठी फ़िरताना एका वृद्धानं एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं.आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे मासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.
 न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तू  कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??..
मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?"
 त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही, पण त्या  माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला....!

किर्रर 
(संकलन)

भारतीय स्त्री-सौंदर्य


भारतीय स्त्री-सौंदर्य

या जगात भारतीय स्त्री-सौंदर्य हेच खरे. मुंबै-दिल्ली-बंगळुरातले बिनबाह्यांचे आधुनिक आणि फ्यॅशनेबल स्त्री-सौंदर्य, पेशवाई ब्राह्मणी-कायस्थी -घाटी मराठी स्त्री-सौंदर्य, कधी अत्यंत देखण्या तर गुडीगुडी गोडगोड गुजराथी खमण-ठेपला अने ढोकलावाल्या भाभ्यांचे स्त्री-सौंदर्य, तर कधी लस्सीसारखे घट्ट-आव्हानात्मक-उफाड्याचे-मक्कई रोटीसारखे गरमागरम पंजाबी स्त्री-सौंदर्य! नखर्‍यानटव्याचे-लाडिक रुसव्याफुगव्याचे -होळीच्या रंगात नटलेले मथुरा-बनारसचे स्त्री-सौंदर्य, तर कधी नाजूक-नितळ कांतीचे परंतु त्याचसोबत बिर्याणीची खुशबू असलेले लखनवी-काश्मिरी मुसुलमानी पडदनशीन स्त्री-सौंदर्य, कधी रोशोगुल्ल्याइतकेच नाजूक-पटकन विरघळणारे मुनमुनसेनी स्त्री-सौंदर्य, तर कधी अजमेरी कलाकंदासारखे खमंग आणि बिकानेरी शेवेसारखे चविष्ट-आगे दुकाण अणे पिछ्छे मकाण असलेल्या मारवाड्याला हळूच आतल्या मकाणात बोलावून लाडिकपणे " अजि सुणोजी!" म्हणणारे राजस्थानी स्त्री-सौंदर्य! आणि सरतेशेवटी सुंदर मोकळा केशसंभार, आखीवरेखीव भुवया, सुंदर नाकेलं नाक, बोलके डोळे असलेलं,आणि जीवघेण्या आव्हानात्मक बांध्याचं दाक्षिणात्य स्त्री-सौंदर्य! असं हे विविधतेने नटलेलं भारतीय स्त्री-सौंदर्यच या जगात आम्हाला सर्वाधिक प्रिय आहे! नाय, तश्या तुमच्या अमेरिकन नी कोरियन, नी रशियन, नी विंगलंड, नी जापनीज बायड्या असतीलही छान, परंतु, स्त्री-सौंदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत -गाणं-बजावणं, या तीन बाबतीत भारताइतकी महासत्ता कोणाकडेच नाही..! :) असो.. 

हा  लेख 'तुझे आहे तुजपाशी' मधल्या काकाजी देवासकरांना सादर समर्पित! 

किर्रर 
(संकलन)

एक छोटा मुलगा


एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो,
तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम
मला द्याल का ?
फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
... मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.
फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर
समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फरशी साफ
करण्याचे काम पण करेन.
फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू
आजपासून माझ्याकडे काम कर .......
मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू
कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?
मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत
कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई
माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे
मला बघायचे होते.

किर्रर 
(संकलन)